रणधुरंधर श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांना सादर प्रणाम !
श्रीमंत ,
पत्रास सुरुवात करण्यापूर्वीच श्रीमंतांची माफी मागतो . महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेऊन , मराठ्यांच्या समशेरीचा वचक , आलम हिंदुस्तानात बसविणाऱ्या आपल्यासारख्या अजेय आणि पराक्रमी योद्ध्याच्या नजरला नजर भिडवावी इतकी आमची पात्रता न्हाई … तरीबी पत्र लिवायचं धाडस करतोय … त्यामुळं काही चूका झाल्या तर आम्हाला लेकरावाणी पोटाशी धरा .
आमच नाव तात्या डोंगळे . महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात आमचं लहाणपण गेलं आणि आम्ही म्हराटी सातवी पर्यंत शिक्षण कर्नाटकातच घेतलं… तिथ इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही आम्हाला कधीच नाही भेटलात श्रीमंत …अगदी ओझरता उल्लेख व्हता पण ज्यादा न्हाई . खर सांगायचं म्हंजी आम्हाला इतिहासात मराठ्यांच्या इतिहासापेक्षा टिपू सुलतान , हैदरअली , वीर राणी चन्नमा , दुसरा पुलकेशी ह्यांचा इतिहास शिकाय मिळाला . पण आम्हाला आमच्या आईच्या भाषेची आणी मराठ्यांच्या इतिहासाची आवड अगदी पहिल्यापासून . त्यामुळं आम्ही पुस्तक वाचीत व्हतो .
रियासतकार सरदेसाई , वि . का . राजवाडे पासून ते पानिपतकार विश्वासराव पाटील ह्यांची झाडून समदी पुस्तकं वाचून काढली . जसा जमलं तसा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला . मोडी लिपी शिकलो थोडीबहुत .
साधारण २० ते २२ वर्षांपूर्वी आम्ही पुण्यनगरीत शिकाय आलो तवा शनिवारवाड्यावर आपला घोड्यावर बसलेला पुतळा पाहिला ( पुण्यात त्याला अश्वारूढ पुतळा म्हणत्यात ) आणि आमच्या धमन्यातल रक्त उसळ्या मारू लागलं . पुण्यातल्या त्यावेळच्या वातावरणानं आणि आम्हाला भेटलेल्या चांगल्या मित्र मंडळींमुळे आम्ही किल्ल्यांसाठी वेडे झालो . मराठ्यांच्या इतिहासाच्या आवडीपोटी आमीबी चांगले दोनेशे ते सव्वादोनशे वेगवेगळे किल्ले पालथे घातले . थोरल्या महाराजांनंतर , आमचं दूसर प्रेम कोणावर असेल तर ते म्हणजे तुम्हीच . मध्य प्रदेशातल्या आपल्या रावेरखेडीच्या समाधीवर बी आम्ही दोन वेळा डोक ठीऊन आलो .
सध्या गेल्या चार वर्षांपासून आम्ही इथ युरोपात जर्मनीमदी राहतो … पण श्रीमंत तुम्हास्नी एक गोष्ट सांगावी म्हणतो , आपल्याला वळीखणारे आणि आपल्या लढायांचा अभ्यास करणारे लोक इथबी हायेत . फ्रांस मधल्या स्ट्रासबोर्ग नावाच्या शहरात पौल मॉजे ह्या आमच्या मित्राला तुम्ही पालखेडची लढाई कशी लढलात हे माहिती आहे . त्यांच्या लष्करी शाळेत बाजीराव पेशवा कोण हे शिकवत्यात . इथं आमचा एक तुर्की मित्र आहे आणि त्याला अफगाणी अहम्दशहा अब्दालीची आणि इराणच्या नादीरशहाची माहिती आहे तशी आपलीसुद्धा माहिती आहे . हे लोक इतिहास तज्ज्ञ आहेत असं आम्हाला न्हाई म्हणायचं . पण तीनशे वर्षांपूर्वी मराठ्यांच्या समशेरीचा दरारा कुठपर्यंत पोचला होता हे आमच्या मित्रांकडून ऐकून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो . माफी असावी श्रीमंत , पन येवढ पाल्हाळ लावायचं कारण येकच आणी त्ये म्हंजे तुमी आमच पत्र शेवटपत्तूर वाचाल .
पत्र लिवायचं खर कारण आता सांगत हाये . सध्या आपल्या महाराष्ट्रामधी तुमच्या आणि मस्तानीबाई साहेबांच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने चांगलाच धुरळा उठलेला हाये . जो उठेल तो आपलं मत देतोय … सोशल मिडीयावर नुसती राळ उडवून दिलेली हाये समद्यांनी . आणि श्रीमंत , मजा म्हंजे कुठलाबी राजकीय पक्ष पक्ष ह्यमदी सामील न्हाई . आम्ही लय विचार केला ह्यावर . आणि लक्षात आलं की कदाचित तुमच्या नावाचा त्यांना मतासाठी आणि निवडणुकीसाठी काही फायदा न्हाई . असो सांगायचा मुद्दा असा की सगळीजण आपलीच घोडी दामटवत सूटल्येत , पण एका मोठ्या माणसाला, ज्यानं मराठ्यांची भीमथडीची तट्ट यमुनापार केली त्याना , म्हणजे आपल्याला ....साक्षात श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांना कोणीच काही विचारात न्हाई … आणि म्हणूनच हा पत्रप्रपंच .
आता थोडक्यात मुद्दा सांगतो श्रीमंत.
१. आपल्या बॉलीवूड मध्ये एक दिग्दर्शक हाये … प्रेमकथेवर भव्यदिव्य चित्रपट तयार करणं ही त्याची खासियत . त्याच नाव संजय लीला वाटलावली न्हाई भन्साळी . तर श्रीमंत , त्यानं साक्षात तुमच्यावर आणि मस्तानी बाईसाहेबांवर एक चित्रपट बनवलेला हाये … फक्त २०० कोटी टाकून … एकदम कोरा करकरीत .. जबरदस्त युद्धप्रसंग आणी प्रचंड शेट ( सेट) … सगळ कस एकदम भव्य . … आता ह्यावर आमच कायबी म्हणण न्हाई . एक मराठी नसलेला माणूस मराठ्यांच्या / पेशव्यांच्या इतिहासावारती चित्रपट बनवतोय आणी त्यो चित्रपट जगभर बघितला जाणार ह्याचा आम्हाला अतीव आनंद आहे .
२. ह्या चित्रपटात रणवीर सिंह नावाचा एक चांगला आणी थोडा गमत्या अभिनेता तुमची भूमिका करणार हाये . तुमच्यापेक्षा त्याची उंची थोडी कमी आहे पण काही हरकत नाही ( तशी आमचीबी उंची कमीच हाये )
३. दीपिका आणी प्रियांका म्हणून दोन शिडशिडीत नट्या हायेत त्या अनुक्रमे मस्तानीबाई साहेब आणि काशीबाई राणीसाहेब ह्यांच्या भूमिका करणार हायेत. इथबी काही हरकत नाही . आम्हाला दोघीबी आवडतात… अभिनेत्री म्हणून
आमची खरी हरकत पुढे आहे
१. काशीबाई राणीसाहेब आणि मस्तानीबाई साहेब ह्याना ह्या चित्रपटात एकत्र नाचताना दाखिवलंय , जे इतिहासात घडणे शक्य नव्हते , खर म्हणजे घडलच नाही .
त्यातून ह्या दोन स्त्रिया बेंबाटताना दाखविल्या आहेत ( बेंबी दाखवत नाचणे ) . मराठेशाही आणी पेशवाईतील कुलीन स्त्रियांच्या पेहरावा बद्दल मी आपल्याला काय सांगणार श्रीमंत ? पिंग्याच्या नावाने लावणी सारखा नृत्यप्रकार दाखवून दिग्दर्शकाला आपला गल्ला वाढवायचा आहे हे उघड आहे . आम्हास्नी बी लावणी जाम आवडते … पण पिंगा म्हंजी लावणी न्हाई ना ? असो , दीपिका आणी प्रियांका ह्या सुंदर अभिनेत्री आहेत , आम्हाला त्याचं सर्व नृत्यप्रकार आवडतील , पण त्या चटकचांदण्यांना मराठ्यांच्या इतिहासाशी काय देणघेण , पैसे आणि चांगली भूमिका मिळाली की संपलं … दिग्दर्शकाच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्या .
पण येक महत्वाची गोष्ट आहे , संजय लीला भन्साळी हा माणूस आपले म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे नाव वापरून चित्रपट बनवतोय … तेबी कुणाला कुठलीही रॉयलटी न देता … आणी तेबी इतिहासाचे लचक तोडून . ' श्रीमंत ' , इतिहासाचा काथ्याकूट मी करत बसत नाही … आपणापेक्षा सत्य अधिक कोण जाणणार?
२. अर्ध्या पेक्षा अधिक हिंदुस्तान आपला ताब्यात घेणारं बाजीराव पेशवे जेव्हा चित्रपटात ' वाट लावली … वाट लावली' किंवा ' चटक मटक चटक मटक ' अस म्हणतात तेव्हा चांगलच खटकत आम्हाला ते श्रीमंत … बाजीराव पेशवा म्हणजे कोणी टपोरीगिरी करणारा दाक्षिणात्य भडक चित्रपटातला हिरो नाही . त्यांच्या तोंडचं शब्द गीतकाराने निवडताना काळजी घेतली पाहिजे .
३. हे ह्या चित्रपटाचे फक्त प्रोमोज आहेत … खरया चित्रपटात अजून काय वाट लावली आहे हे फक्त भन्साळी लाच माहिती असेल आणि ते १८ डिसेंबर ला कळेल ,
असो , आपण सत्य जाणताच … मी काय सांगणार आपल्याला ?
आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही …आम्हीबी कलाकार हाये . येखादा चित्रपट करताना कलात्मक मुभा ( म्हराटीत त्याला आम्ही शीनेमाटीक लिबर्टी म्हणतो ) घेण नवीन न्हाई पण इतिहासाची तोड फोड करून नाही एवढंच आमचं म्हणण आहे .
विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आम्ही न्हाई . ह्या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा हायेत हे नक्की पण चूका दुरुस्त केल्यावर .हा चित्रपट ४०० काय ५०० कोटी कमवूदे आम्हाला आनंद हाये . आमच्या मराठी साम्राज्याचा डंका परत एकदा जगभर वाजेल .पण आहे त्या घोडचूका तशाच ठेऊन हा जर चित्रपट प्रसिद्ध झालाच तर चुकीचा इतिहास इतिहास लोकांसमोर येईल .
असो , जाऊदे ज्यादा इच्चार करून डोस्क्याची मंडई न्हाई करणार आता . श्रीमंत खर सांगतो आम्हाला आता ह्याची आता भीती वाटेनाशी झालीये … कारण असे भन्साळीचे किंवा अजून कोणाचे छप्पन्न चित्रपट येतील
पण आमच्या मनातील श्रीमंत बाजीराव एकच असतील , ते म्हणजे मोंगल , निजाम , पोर्तुगीज , सिद्दी अशा सर्व शत्रूंना पुरून उरणारे आणि मराठ्यांचा जरीपटका आलम हिंदुस्थानवर फडकवणारे रणधुरंधर श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे
बहुत काय लिहिणे ?
आपला नम्र
तात्या डोंगळे
मु. पो. जर्मनी
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥